दिव्यातील आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा खासदार निधी
· भुमीपुत्रांची संस्कृती, परंपरा ठसठशीतपणे दिसणार, दिवा बेतवडे गावात होणार आगरी-कोळी आणि वारकरी भवन
ठाणेः कोकण पट्ट्यातील ठाणे जिल्ह्यात मुळचे भूमीपुत्र असलेल्या आगरी, कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, या उद्देशाने आगरी भवन उभारण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा - बेतवडे गावात यासाठी असलेल्या सुविधा भूखंडावर आता आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारले जाणार आहे. भवनाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने तब्बल १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आगरी-कोळी आणि वारकरी भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आपल्या पारंपरिक कामांपासून दूर जात या समाजातील बांधवांनी गेल्या काही वर्षात इतर कामे स्विकारली आहेत. बहुभाषिक होत चाललेल्या शहरांमध्ये स्थानिक आगरी, कोळी समाजाची ओळख नव्याने ठसठशीतपणे होण्याची गरज आहे. आगरी, कोळी समाजाची संस्कृती जोपासली जावी. आगरी समाजातील बांधवांना आपली संस्कृती टिकवण्यासाठी, सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या भावनेतून ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा बेतवडे गावात आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते.
बेतवडे गावातील सर्व्हे क्रमांक ३६ हा भूखंड पालिकेच्या सुविधा वापरासाठी होता. येथे या भवनाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता होती. स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, सुनीता गणेश मुंडे, दर्शना चरणदास म्हात्रे, दीपक नामदेव जाधव यांनी या भवनाची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. अखेर दिवा बेतवडे गावातील नियोजीत जागेवर आगरी, कोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या या निधीमुळे या भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचे आगरी, कोळी आणि वारकरी बांधवांच्या वतीने आभार मानले आहेत.
· असे असेल भवन
आगरी-कोळी समाजाची एक वेगळी ओळख, संस्कृतीचे दर्शन सर्वसामान्यांना व्हावी यासाठी या भवनात स्वतंत्र दालन उभारले जाणार आहेत. यात कलादालन, सभागृह, मंच, स्वच्छतागृह, प्रेक्षागृह अशा गोष्टी समाविष्ट असतील. नागरिकांना आगरी समाजाची ओळख, संस्कृती, जडणघडण, परंपरा, इतिहास, महत्व कळण्यास मदत होईल.
भवनात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र दालन उभारले जाणार आहे. हे भवन सामाजिक बांधिलकीचे प्रतिक ठरेल अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment