योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

*"पहिली कमाई"*First Income !

                          इयत्ता सहावीला होतो. नुकत्याच मे च्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. त्या वेळी आम्ही खालच्या गल्लीला राहत होतो. तिथेच शेजारी एक चुलत भाऊ रहायचा. सुनिल लोंढे त्याच नाव. तो त्या वेळी पिंपळगाव हायस्कूल ला शिकायला होता. आमची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी नदीला जायला, सायकल मारायला, शेताकडं जायला आम्ही एकत्रच जात होतो. एके दिवशी दुपारी तो मला खाली रस्त्याला घेऊन गेला. बरोबर एक तंदुस ची पिशवी पण घेतली होती. आम्ही चालत चालत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जात होतो. रस्त्यावर एका करंजीच्या झाडाजवळ आम्ही पोहचलो. पूर्ण झाड करंजीच्या बियाणे व्यापून गेलेलं होतं.

काही करंज्या तर वाऱ्याने आधीच खाली पडल्या होत्या. तो म्हणाला मी झाडावर चढतो आणि वरून फांद्या हलवतो.तो अश्या कामात फारच चपळ होता. खाली पडलेल्या करंज्या गोळा करायचं काम माझं. बघता बघता तंदुस ची पिशवी भरत आली. मी त्याला खालूनच हाक मारली. मग तो उतरला. ओल्या करंज्यामुळे पिशवी फारच जड वाटत होती. कशीबशी दोघांनी ती घराकडं आणली. करंज्या अर्ध्या अर्ध्या वाटून घेतल्या. घरी येईपर्यंत कातरवेळ झाली होती. सकाळी उठून दारात करंज्या वाळत घातल्या.परत संध्याकाळी तिच पिशवी  घेऊन आम्ही परत रस्त्याला गेलो .काल सारखंच तो वरून करंज्या  झाडत होता. मी खाली पडलेल्या त्या गोळा करत होतो. पिशवी भरली की आम्ही घरची वाट धरायचो.आणलेल्या करंज्या दुसऱ्या दिवशी वाळत घालायच्या .

ज्या करंज्या वाळलेल्या आहेत त्या  फोडायच्या.त्यातल्या बिया काढायच्या. असा आता आमचा दररोजचा अलिखित नियम बनला होता. काढलेली फोलं न्हानीच्या चुली शेजारी ठेवायची. वाळलेल्या बिया एका पिशवीत भरून ठेवायचो. करंजी बिया खूपच गुणकारी .त्याचे तेल बनवता येते. जखमेवर करंजबी उगाळून लावता येते. त्याच तेलाने मधुमेही रुग्णाला मसाज करता येतो. त्यामुळे या करंजीला खुपच मागणी होती. म्हणूनच  काटे व्यापारीदेखील  भात, कुळत्या,भुईमुगाच्या शेंगाबरोबर करंजीच्या बियाही  विकत घेत असत. आम्हाला त्यावेळी करंजीच्या गुणधर्मामध्ये एवढा रस नव्हता. ते विकून पैसे मिळणार ह्यातच  जास्त रस होता. हळूहळू वाळलेल्या बियांची पिशवी भरत आलेली होती .आम्ही एक मंगळवार बघून(पिंपळगावचा आठवडी बाजार)पिंपळगावला जायचं ठरवलं. त्याने त्याची पिशवी घेतली मी माझी पिशवी घेतली. चालतच आम्ही पिंपळगाव गाठलं .जिथं बाजार संपतो तिथं एक काटे व्यापारी बसला होता. काय रं आणलंय पोराओ..... मी - करंजीच्या बिया. तो - ठेव काट्यावर. माझी तंदुस ची पिशवी काट्यावर ठेवली .वजन भरलं अकरा किलो. त्यावेळी (1999) तीन रुपये किलो होती बी. काट्या व्यापाऱ्याने तेहतीस रुपये ठेवलं माझ्या हातावर. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. काय करू आणि काय नाही असे झाले मला. इतक्या दिवसाच्या मेहनतीची ती माझी पहिली कमाई. आजही आठवतंय दहाच्या तीन नोटा, दोन चा एक कॉइन, आणि एक चा एक कॉइन होता. त्या नोटांपैकी एक दहाची नोट एकदम करकरीत होती. ती करकरीत नोट मी आजही अगदी तशीच जपून  ठेवली आहे .

 माझ्या आयुष्यातली ती पहिली कमाई. आज वीस वर्षानंतर महिना तीस हजार कमविण्याची सुरवात त्या तेहतीस रुपयांनी केली होती. पण त्या दिवसाच्या आनंदाची तुलना आजच्या दिवसांशी होऊ शकत नाही.....त्या तेहतीस रुपयाची तुलना किमान मी तरी आजच्या या कमाईच्या हजारो रुपयांशी करू शकत नाही .कारण ती माझ्या आयुष्यातील खूप भावनिक आणि मला आर्थिक साक्षर करणारी घटना होती.आणि इथूनच माझ्या मनाच्या प्रांगणात करंजीच्या सुवासिक फुलांसारखा वैचारिक , भावनिक, आर्थिक आणि सामाजिक विचारांचा सुगंध पुढे आयुष्यभर दरवळत राहिला आणि राहील.म्हणून ही निव्वळ पहिली कमाई न्हवती तर माझ्या कोऱ्या करकरीत मनात रुजणारी चांगली आणि अनमोल अशी बीजं होती....!
     " स्वच्छ बीजापोटी
      फळे रसाळ गोमटी"
"आज उभारले इमले बंगले
पहिल्या कमाईचे पुण्य सगळे...!"

         - अविनाश लोंढे
          9821896825

Comments

  1. अविनाशजी आपले हे विचार वाचून मला सुद्धा माझ्या पहिल्या कमाईची आठवण झाली... आपण पहिली कमाई देवाजवळ ठेवतो.. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देतो.. खरच मानसाच्या मनावर खोलवर परिणाम करणारे काही क्षण असतात. या नश्वर जगात भावनांमुळेच अर्थ प्राप्त झाला आहे. खुप छान ! कवी मनाच्या आपल्यासारख्या व्यक्तीकडून अशाच लिखाणाची अपेक्षा होती. Keep it up !

    ReplyDelete
  2. छान अविनाश माझ्या पन जूनी अठावणी ताज़ा झाल्या

    ReplyDelete
    Replies
    1. अविनाश खुपच सुरेख व अचुकपणे विचार मांडलेस,सर्वं जण पहिली कमाई करतात ,पण विसरुन जातात,किंवा काही थोडेच ते शब्दबद्य करु शकतात .

      Delete
  3. Khupach chan Avi. Likhan chan kele aahes. Lockdown mule junya athvanina zale lagli.

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना ,सहज सोपी भाषा शैली आणि या लेखातून माझ्यासारख्या कित्येकांच्या पहिल्या कमाईची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ...!

    ReplyDelete
  5. लई भारी ,अविनाश. गेले ते दिवस पण राहिल्या त्या आठवणी पहिली कमाई

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लिहिलयस... बालपणीचा काळ सुखाचा....अप्रतिम....

    ReplyDelete
  7. Khupach chan avinash mala vatal navata tu yevda brilliant ahes aaj kokan dolya samor analas mast good job avi keep it up chan lekh ahe

    ReplyDelete
  8. साठवणीतील आठवण भविष्यात ऊर्जा देते. धन्यवाद .🙏 👌🌹

    ReplyDelete
  9. खूप चांगली आठवण संगीतलीस सगळ्यांना
    खूप छान


    - मंदार

    ReplyDelete
  10. वाह भाई...
    इतक्या छोट्या वयात जी आपल्याला आर्थिक ,वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भता लाभली ती खूप ग्रेट आहे...!

    ReplyDelete
  11. आभारी आहे कविवर्य

    ReplyDelete
  12. खूपच छान...बालपणाचा काळ आठवला...नदीवताडानं करंज्या गोळा करत फिरायचं...त्या फोडून बियांची विक्री करायची या कष्टातला त्यावेळचा बालआनंद निराळाच होता...आणि ती कमाई म्हणजे..प्रामाणिक कष्टाच्या फळाचा संस्कार करणारीच....

    ReplyDelete
    Replies
    1. सर...नक्कीच प्रामाणिक कष्ट होते

      Delete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा