सचिनच्या भारतरत्न वरून पुन्हा वाद सुरु !

सचिनच्या भारतरत्न वरून पुन्हा वाद सुरु !


बाबुराव खेडेकर :ठाणे १८ नोव्हे. २०१३ -विक्रमांचे डोंगर रचून आणि आदर्श राहणीमानामुळे करोडो क्रिकेटप्रेमी भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारया मराठमोळ्या सचिनला भारतरत्न मिळताच अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. खेळांसाठी भारतरत्नाचे प्रयोजनच नाही, सचिन आधी सुद्धा अनेक खेळाडू आहेत असे प्रश्न पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत.भाजपच्या कांही ज्येष्ट नेते मंडळीनाही वाजपेयींचे नाव भारतरत्न साठी सुचवायला हेच निमित्त मिळाले असावे !
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 'भारतरत्न' देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे खासदार शिवानंद तिवारी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 'सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' देण्याचा निर्णय अत्यंत हास्यास्पद आहे. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्याला 'भारतरत्न' देण्याचे औचित्य काय,' असा सवाल तिवारी यांनी केलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सचिनला 'भारतरत्न' पुरस्कार घोषित झाल्याबद्दल देशभरात आनंद व्यक्त होत असतानाच शिवानंद तिवारी यांनी जाहीर वक्तव्य करून अनेकांच्या आनंदावर विरजण घातले आहे. 'भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक विनोद होऊन बसला आहे. तो पुरस्कार रद्दच करायला पाहिजे. आता त्याला कसलेही मोल उरलेले नाही, असे सांगतानाच, 'तेंडुलकर हा काही फुटक क्रिकेट खेळलेला नाही. त्याने कोट्यवधी रुपये कमावलेत,' असे तिवारी म्हणाले.सचिनच्या 'भारतरत्न'ला आक्षेप नोंदविताना तिवारी यांनी अन्य मोठ्या व्यक्तींचेही दाखले दिले. 'सचिनच्या आधीही अनेक मोठी माणसे देशात होऊन गेली. ही सर्व माणसे 'भारतरत्न'ची हकदार होती, असे सांगून, हॉकीपटू ध्यानचंद, कर्पुरी ठाकूर यांचा यासाठी विचार का झाला नाही,' असा सवालही तिवारी यांनी केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' दिला मग भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना हा सन्मान का नाही?, असा सवाल भाजपने केल्यानंतर अनेक पक्षाचे नेते या मागणीमागे उभे राहिले आहेत. नितीश कुमार, काँग्रेस नेते व केंद्रीय मंत्री पल्लम राजू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी आज जाहीरपणे या मागणीचे समर्थन केले.काँग्रेस सरकार भारतरत्नच्या बाबतीत भेदभाव करत आहे. या पुरस्कारांत घराणेशाही शिरली आहे, असा आरोप करत भाजपने रविवारी वाजपेयी यांचे नाव पुढे केले होते. भारतरत्नसाठी वाजपेयी कसे योग्य आहेत हे सांगण्यासाठी वाजपेयी यांच्या कार्याचा लेखाजोखाही मांडण्यात आला होता. त्यानंतर आज भाजपच्या मागणीला आणखी बळकटी मिळाली.भाजपपासून दूर गेले आणि वाजपेयांचे हितचिंतक राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सध्याचे शत्रूत्व विसरून वाजपेयी यांना भारतरत्न दिला गेला पाहिजे, असे सांगितले. सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य आहे. सचिन या पुरस्कारासाठी पात्रच होता, असे नमूद करताना वाजपेयी यांना अद्याप हा पुरस्कार का देण्यात आला नाही?, असा सवाल नितीश यांनी केला. नितीश यांच्या या विधानानंतर काही वेळातच आंध्र प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री एम. पल्लम राजू यांनीही वाजपेयींच्या नावाचे समर्थन केले. वाजपेयींना भारतरत्न मिळावा, ही देशाची इच्छा असेल तर नक्कीच त्यांना हा सन्मान मिळायला हवा. ते खरंच एक महान स्टेट्समन आहेत, असे राजू म्हणाले. या यादीत त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स या काँग्रेसच्या मित्रपक्षाचे नेते फारूख अब्दुल्ला यांचेही नाव जोडले गेले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा